Pages

Total Pageviews

Tuesday, November 5, 2013

दानू बावा

मुंबईच्या 'फ़ाइव गार्डन' ह्या माटुंगा मधील भागात बरीच वर्दळ असते. गार्डन म्हटलं तर टांगे, छोटे पाळणे, भेळवाले, चणे-दाणे वाले आणि तत्सम विक्रेते असतात. लोकं आपल्या पोरांना घेऊन गार्डन मध्ये फिरायला येतात. कुठे दहा-बारा संघ वेगवेगळ्या खेळपट्ट्या पकडून एकाच मैदानात क्रिकेट खेळायची कसरत करीत असतात तर कुठे कुणीतरी संध्याकाळी तिथल्या कट्ट्यांवर योग किंवा कराटेचे 'क्लासेस' घेत असतात! जवळच २-३ कॉलेज असल्यामुळे तिथल्या जोडप्यांनी गार्डन मधील अंधारे कोपरे बऱ्याच चतुराईने शोधलेले असतात. शिवाय ह्या क्रियेला 'कॉलेज' ही मर्यादा नसल्यामुळे अशा लोकांची संख्या किंबहुना ( आणि मुंबईतील जागेच्या प्रश्नामुळे) जरा जास्तच असते! तर अशा ह्या गजबजलेल्या वातावरणा पासून थोडे पुढे चालत आलो आणि दादर च्या दिशेला जाऊ लागलो की एक वातावरणातील विरोधाभास जाणवू लागतो. रस्त्यावर शांतता निर्माण होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जुन्या शैलीतील इमारती दिसू लागतात. एक अगीयारी दिसते आणि आपण पारसी वस्तीत आल्याचे जाणवते. आणि पुढे 'मंचेर्जी जोशी' चौक येईपर्यंत आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबईची कल्पना करू लागतो. कुठे एखादा टांगा डोळ्यासमोरून धावतो तर कुठे एखादा सुट-बूट घातलेला इंग्रज अधिकारी समोर येतो. वातावरण मात्र ' कृष्णधवल' ( black & white ) असते. दानू ह्याच परिसरात लहानाचा मोठा झाला.

वास्तविक दानू हा माझा क्लासमेट. वेलिंगकर मध्ये  MBA शिकत असताना आमची ओळख झाली. हा योगायोगाने पहिल्या लेक्चरच्या वेळेस माझ्याच बाजूला बसला आणि मुलांमध्ये लगेच मैत्री होत असल्यामुळे आम्ही त्याच दिवसापासून गप्पा मारायला सुरुवात केली. हा माझ्याच प्रमाणे काही विषयात ज्ञान वाढावे म्हणून  MBA करीत होता. राहत होता वसईला आणि ऑफिस गोरेगावला.

एकदा प्रोफेसरांनी कुठला एक प्रश्न विचारला असताना ह्याने त्याचे उत्तर सरळ शब्दात द्यायचे सोडून थोडे लांबवून दिले. बोलण्यात थोडासा खट्याळपणा दिसला आणि सारा वर्ग हसला. आणि त्या दिवसापासून  हा काहीही बोलला तरी इतर मुलांची हसायला सुरुवात होऊ लागली. ते कसं आहे, एखाद्याला brand करायची सवय आम्हाला शाळेपासूनच आहे! हीच सवय मग काम करत असतानाच्या  MBA च्या वर्गात सुद्धा समोर येते. दानू मस्तीखोर होता. पण तो वर्गातला 'जोकर' नक्कीच नव्हता! त्यामुळे एकदा असेच नवीन प्रोफेसरांना ओळख करून देताना जेव्हा वर्गातली मुलं त्यावर हसली तेव्हा मात्र दानू ने त्यादिवशी रात्री १० वाजता मला फोन केला,

" माझं बोलणं जोकर सारखं होऊ लागलंय का? मी काहीही बोललो तरी लोकं का हसतात? मला हे अपेक्षित नव्हतं. तू मला समजून घेऊ शकतोस असं वाटतं … म्हणून तुला विचारलं!" त्यादिवशी त्याला जवळ जवळ अर्धा तास समजावलं.
" लोकं काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नकोस. जर ह्या लोकांमुळे तुझ्या आयुष्यात काही लक्षणीय बदल घडणार असेल तरच ह्यांच्यावर इम्प्रेशन जमव… नाहीतर त्यांना हसू दे!" माझ्या बोलण्यामुळे त्याला धीर आला असावा. कारण त्यानंतर तो माझ्या बरोबर अधिक बोलू लागला. घरी जाताना दादर स्टेशन पर्यंत एकत्र येऊ लागला. एकंदर करियर, पुढील आयुष्य वगेरे हे विषय येऊ लागले. आम्ही दोघेही ८७' साली जन्म झालेले निघलो. त्यामुळे आयुष्याची वाटचाल सारख्याच टप्प्यावर आलेली. आणि साहजिकच मैत्री वाढली!

दरम्यान दानू ने त्याचा मस्तीखोर स्वभाव कायम ठेवलेला. तो एका मोठ्या advertising कंपनीत सिनियर मनेजर च्या पदावर होता. लवकरच त्याची बढती होऊन तो regional manager देखील होणार होता. पगार चांगला होता. आणि पदाप्रमाणे बघितले तर माझ्या वयाचा असून सुद्धा माझ्या पेक्षा बराच सिनियर होता. त्याने बऱ्याच लहान वयात नोकरी करायला सुरुवात केलेली आणि इथपर्यंत पोहोचला होता. पण हे सर्व सुरु असताना त्याची मस्ती काही कमी झालेली नव्हती. तोच कॉलेज मधला खट्याळपणा त्याने सुरु ठेवला होता आणि त्यामुळे त्याच्या एकंदर पदाशी विसंगती निर्माण होत होती. आता दोन अविवाहित मित्रांमध्ये बोलले जाणारे विषय हळू हळू पुढे पुढे येऊ लागले होते आणि विषय लग्नावर येउन पोहोचला.

" माझी एंगेजमेंट झालेली आहे. लग्न करायला घरचे मागे लागले आहेत रे. दोन्हीकडचे. पण काय करू. सध्या सगळे पैसे नवीन घर घेतानाच्या हफ्त्यात जात आहेत. मुंबईचे जीवन तुला माहिती आहेच…"
" पण मग तू घर घेण्यात एवढी घाई का करतो आहेस?" मी विचारले.
" अरे...  मी सध्या राहतोय ते घर एवढं मोठं नाही रे. शिवाय चांगल्या परिस्थितीत देखील नाही. त्यामुळे लग्न झाल्यावर तिकडे राहण्यात काही अर्थ नाही. आणि शिवाय माझी बायको पारसी नाही ना… ", हसत हसत दानू म्हणाला.
" मग?" मी विचारले.
" अरे… आमच्या पारसी पंचायतचा नियम आहे. जर तुम्ही समाजाच्या बाहेरच्या मुलीशी लग्न केलंत तर तुम्हाला घर मिळणार नाही. पारसी कॉलोनी मध्ये तुम्ही राहू शकत नाही. आणि नेमका माझा प्रॉब्लेम तो आहे. सध्या आम्ही ज्या घरी राहतोय ते पारसी पंचायतचे आहे… आणि लग्नानंतर मला ते सोडावे लागणार आहे. माझ्या आई-बाबांना वसईला घर मिळाले होते. माझी आजी इकडे पारसी कॉलोनी मध्ये राहते…", तो म्हणाला.
" पण असं का?" मी विचारले.
" अरे…. मुंबईत पारसी लोकांची संख्या काही हजार इतकीच उरली आहे. त्यात सुद्धा ६०% लोक हे ४० च्या पुढचेच आहेत. त्यामुळे त्यांना मुलं होणार नाहीत. उरलो आम्ही.… आमच्याकडून अपेक्षा आहेत…. पण मला आवडणारी मुलगी पारसी नाही… काही वर्षात आम्ही संपुष्टात येऊ बघ", दानू अगदी शांतपणे म्हणाला. एकीकडे प्रत्येक भाषिक किंवा धार्मिक समाज आपले अस्तित्व जाणवू द्यायची चढाओढ करीत असताना आमचा समाज संपुष्टात येईल हे किती सहजपणे म्हणाला तो!

जसे दिवस पुढे जात होते तसे आमचे विषय वाढत जात होते. परंतु आपण कधी 'सेटल' होणार हा भेडसावणारा प्रश्न पुढे यायचा. तेव्हा तो सतत त्याच्या ह्या परिस्थिती बद्दल सांगत असे. जोपर्यंत त्याला नवीन घराचा ताबा मिळत नाही तो पर्यंत त्याचे लग्न होणार नव्हते. कारण जर लग्न आधी झाले तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी पारसी पंचायतचे ते घर सोडावे लागणार होते. आणि मुलीकडले ( पारसी नसल्यामुळे कदाचित) ह्या गोष्टीचे गांभीर्य समजण्यात कमी पडत होते आणि लग्नाची घाई करीत होते. एक दिवस गप्पा मारत मारत आम्ही दादर स्टेशन पर्यंत आलो. तेव्हा तो म्हणाला,
" आज मला आजीकडे जायचे आहे. … ती इथेच पारसी कॉलोनी मध्ये राहते. पारसी जिमखाना च्या मागे. तू वडाला स्टेशन वरून जाणार ना? चल मी तुझ्या बरोबर येतो." मला त्या दिवशी नेमके ट्रेन ने जायचे होते. मी देखील तयार झालो.  आणि चालत चालत, गप्पा मारत आम्ही वर वर्णन केलेल्या 'मंचेर्जी जोशी' चौकात आलो.

" इकडे आल्यावर जुन्या मुंबईचे चित्र डोळ्यासमोर येते,नाही?" मी म्हणालो. " म्हणजे … आपला जन्म पण झालेला नव्हता … पण त्या काळाबद्दल काहीतरी वाचलेले असते", मी म्हणालो.
" हो रे … ते खरं आहे… माझी आजी इकडेच राहते. बघ … त्या बिल्डींग मध्ये… ", दानू ने एका बिल्डींगकडे बोट केले.      
" खरंच खूप जुनी बिल्डींग आहे रे … ", मी म्हणालो. दानू ने आता मला त्याच्या घरी यायची गळ घातली. मी नाकी म्हणालो तर एवढी जुनी बिल्डींग आतून पण बघ असे आमिष दाखवले. मग मात्र मला राहवले नाही. आणि आम्ही आत एका घरात शिरलो.                    

" दानू आव्यो...मारो दानू आव्यो", असं म्हणत म्हणत एका तुकतुकीत चेहऱ्याच्या आजीने दरवाजा उघडला. तोंडात दोन- तीन दात शिल्लक असून सुद्धा त्या आजीचे हसणे अगदी गोंडस जाणवत होते. पारशी पद्धतीचा 'ड्रेस', जुना शैलीचा चष्मा, बुटकी उंची आणि केसांचा अंबाडा. माझी ओळख करून दिली गेली आणि आम्ही आत शिरलो. आत गेलो तर फक्त एक खोलीचे घर. एका कोपऱ्यात किचन आणि दुसऱ्या एका छोट्याशा कोपऱ्यात बाथरूम-संडास. वर बघतो तर उंच छप्पर आणि एक जुना पंखा. एका कोपऱ्यातून ट्यूब आपले अस्तित्व जाणवू द्यायचा प्रयत्न करीत होती. आपण मुंबईतल्या जुन्यातल्या जुन्या इमारतीत आलो आहोत ह्याची मला परत एकदा साक्ष पटली. ही साक्ष पहिल्यांदा बिल्डींगच्या गेट पाशी पटली होतीच. आणि समोर ह्या आजी माझ्या आणि मी कल्पना करीत असलेल्या ४० च्या दशकातील पारशी प्रभावाच्या मुंबईतल्या त्या 'एरिया' मधला एक दुवा होत्या! आता आजीच ती! आम्हाला बसवलं आणि त्या कोपऱ्यातल्या किचन मधल्या एका कपाटातून एक छोटासा डबा बाहेर काढला. आणि बशीभर बिस्किटं आमच्या समोर आली. मी ह्याला म्हणालोच. " आजी कुठलीही असो… नातवासमोर काहीतरी येणारच!"
" ह्या घरात आयुष्याची पहिली ९ वर्ष काढली. मी, माझा भाऊ, आणि आजी-आजोबा! ह्या घरात खूप आठवणी आहेत... ह्या एका खोलीत! . मला नोकरी मुळे आता वेळ मिळत नाही. म्हणून आजी नेहमी  म्हणते, " दानू आमचा महाराज आहे … त्याच्या मर्जीने येतो." मी हळूच त्याच्या आजीकडे बघितले. ती दानू कडे कौतुकाने पाहत होती.

" मग तुमच्या सणाच्या दिवशी आई-बाबा वगेरे सगळे इकडे येता का?" मी सहज विषय वाढवावा म्हणून बोललो.
" माझे वडील वारले रे… असं पण मी आठ वर्षांचा असताना दोघांचा 'डिवोर्स' झाला. लहानपणापासून त्यांची भांडणं होयची.म्हणून मी इकडेच असायचो. नंतरचे लहानपण हॉस्टेल मध्ये काढले. पण हॉस्टेल मध्ये मी खूप मस्ती करायचो …. त्यामुळे मला परत इकडे आणले गेले. मग इथेच होतो नोकरी लागेपर्यंत. आई मात्र वसईला असायची आणि अधून मधून इकडे यायची. दरम्यान आजोबा वारले दहावीत असताना … तेव्हापासून आजीने वाढवले. बस आता नवीन घराची वाट पाहतोय … सगळ्यांना तिकडे घेऊन जायला!"
मी हळूच त्याच्या आजीकडे परत एकदा पाहिले. हे सांगताना ती कुठे तरी शून्यात बघत बसली होती. कदाचित ह्या आठवणी तिला पुन्हा आल्या असाव्यात. मी जाताना मला ' परत ये' असं म्हणाली.
" माझी आजी लक्ष्मी भक्त पण आहे. लक्ष्मी आणि शंकर ह्यांची नित्यनेमाने पूजा करते", मी बूट घालत असताना दानू मला म्हणाला.

वडाळा स्टेशन पर्यंत चालत जाताना मला पहिल्या दिवशी भेटल्या पासून दानूचे सारे किस्से मी आठवले. त्याचे ते हरवलेले बालपण मला एकदम लक्षात आले. लहानपणी सर्वांसारखे व्यक्त होता आले नव्हते त्याला. त्याच्या मस्तीखोर स्वभावाचे कारण चटकन माझ्या लक्षात आले आणि किंचित हसून मी ट्रेन पकडायला पुढे सरसावलो.    


- आशय गुणे :)