Pages

Total Pageviews

Wednesday, October 14, 2015

अर्धा-दशक लहान बायको

प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो. लग्नासाठी मुलगी पहायची म्हणजे तिच्या घरच्यांच्या आधी तिला भेटले पाहिजे हे माझे तत्व निरुपयोगी ठरले होते. कारण ह्या आधी जवळ जवळ डझनभर मुलींच्या घरच्यांना मी तसदीच देऊ शकलो नव्हतो! शेवटी 'आम्ही सांगत होतो' ह्या ध्रुवपदाने सुरु होणारी गाणी मला ऐकावी लागली आणि घरच्यांनी सगळी सूत्र हातात घेतली. परंतु तिथे देखील लगेच यश मिळाले नाही. शेवटी हा दिवस उजाडला.
दार उघडले गेले. माझ्या स्वागताला ( खरं तर गराडा घालायला) एक आजोबा, एक पन्नाशीतले वाटणारे गृहस्थ, त्यांची बायको, एक आजी आणि दुसरी एक स्त्री एवढे सगळे एकदम आले. सुरुवातीचे पाणी वाटप झाले. आणि तिथे बसलेल्या आजोबांची मान माझ्याकडे वळली.
"काय करता?"
" मी ई- कॉमर्स क्षेत्रात काम करतो", मी उत्तर दिले.
" ई …?" आजोबांनी कदाचित तेवढंच ऐकलं. आणि तोच शब्द ताणून मला प्रश्न केला. तेवढ्यात,
" काय झालं आबा? काय झालं ", असं विचारत लगबगीने एक बाई धावत बाहेर आल्या. ताणून धरलेल्या 'ई' चा परिणाम असावा. शेवटी त्या क्षेत्राचे पूर्ण नाव मी पुन्हा एकदा सांगितले.
" काय कॉमर्स वगेरे केलंय का?" आजोबांनी पुन्हा माझ्या समोर पंचाईत उभी केली. ह्या क्षेत्राचा कॉमर्स शिक्षाणाशी काहीही संबंध नाही हे सांगायचा मी प्रयत्न करणार तेवढ्यात सुदैवाने विषय बदलला गेला. मग काही घरगुती, काही स्थानिक, काही राष्ट्रीय तर काही आंतरराष्ट्रीय (!) अशा विषयांवर माझ्या बसण्याची दाखल न घेता बरीच चर्चा झाली. हल्ली 'आपल्यात' उशीरा लग्न कशी होऊ लागली आहेत इथपासून इथले रस्ते कधीही दुरुस्त होत नाहीत इथपर्यंत आणि विरार लोकल म्हणजे एक दिव्यच इथपासून आता आमचा मनोहर आला आहे ना, बघा कसा पाकिस्तानवर हल्ला करतो ते, इथपर्यंत! पाकिस्तान बद्दल बोलताना त्या उत्साहात ह्यांना आता ठसका वगेरे लागतो की काय ह्याची मला एकदम काळजी वाटली. परंतु विषय 'आता अच्छे दिन येणार आहेत' पर्यंत गेला तेव्हा एका आश्वस्त मुद्रेत आजोबा गेले आणि भोवती बसलेल्या सर्वांनी होकारार्थी मान हलवली.
पुढे पारिवारिक पातळीवरच्या वाटाघाटी सुरु झाल्या. एखादी कंपनी समोरच्या क्लायंटने आपल्या बरोबर बिझनेस करावा म्हणून तो म्हणतो ते सगळे जसे ऐकते तसे माझ्याकडचे करत होते. त्या साऱ्या संभाषणात मला एवढेच शब्द ऐकू आले - 'मुलगी पसंत आहे'
" पण तुम्हाला वयाबद्दल काही म्हणायचे नाही ना? म्हणजे … तुमचा मुलगा २८ वर्षांचा आणि आमची मुलगी २२ वर्षांची … ", मुलीकडल्यांकडून एक शेवटचा प्रश्न आला.
"नाही हो", आईने सूत्र हातात घेतली. "आपल्या पिढीला कुठे त्रास झाला? आणि हे आता वाटते हो … पुढे एकदा पस्तीशी वगेरे ओलांडली की दोघेही एकाच लेव्हल वर येतात."
ह्या घरातले सगळे आता माझे नातेवाईक झाले होते.
लवकरात लवकर लग्न झालं पाहिजे असे संकेत मला आधीच मिळाले होते. ते संकेत समोरच्या पक्षाला दिले गेले. समोरच्या पक्षाचे प्रतिनिधी आणि आमचे प्रतिनिधी हे प्रत्येक निर्णय घेण्याआधी वाटाघाटी करायचा आव आणायचे. परंतु समोरचे प्रतिनिधी एकच वाक्य पाठ करून आले होते. 'आमची काही हरकत नाही' ह्या त्यांच्या ठरलेल्या वाक्याने चर्चा संपायची. त्यामुळे लग्नात ज्या पक्षाची बाजू वरचढ ठरते तो 'वर' पक्ष असे मला लहानपणापासून वाटायचे ते काही अगदी खोटे नव्हते ह्याची प्रचीती मला माझ्याच लग्नात येत होती. आणि ३० डिसेंबर २०१४ ही तारीख ठरली. माझ्या बऱ्याच मित्रांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ३१ डिसेंबर नाही निवडली म्हणून! ( माझ्यासाठी नव्हे!).
बाकी माझी एकूण घडण ही इतकी नीरस का झाली आहे हे मला सांगता येत नाही. म्हणजे आयुष्यातल्या एका दिवसासाठी चेहरा गुळगुळीत करणे, त्यावर रंगकाम करणे हे आपण का करतो असा मला प्रश्न पडला. अजूनही त्याचे उत्तर मिळाले नाही. त्या एका दिवसासाठी घेतलेल्या कपड्यांचे पुढे काय झाले हे आता मला चांगलेच माहिती आहे. परंतु तरीही असे करावे लागते. आणि ह्याचे उत्तर 'असे करावे लागते' असेच असते! त्यात पुन्हा आपण त्यांच्यासाठी आणि त्यांनी आपल्यासाठी केलेली खरेदी असते. मग दोन्ही बिलांची घरातल्या गप्पांमध्ये होणारी तुलना आणि आपण दिलेलंच सरस हे ठरवायचा आटापिटा! आणि ह्या साऱ्यात रस दाखवला नाही तर 'पुढे तुझे कसे होणार' ह्याबद्दल व्यक्त होणारी चिंता. एकूण काय तर लग्न ह्या घटनेनंतर आयुष्यात प्रचंड बदल होणार आहे असे उगीचच सांगितले जाते. तसं काही होत नाही हे अर्थात काही आठवड्यांच्या कालावधीत समजतच. ही अवस्था म्हणजे आपल्याला पोहायला जाताना पाण्यात बुडू नाही म्हणून अगदी पाठीला डबा बांधायचा आणि उडी मारल्यावर खोली ३ फुटाची आहे असे समजण्यासारखे असते. पण ह्या साऱ्या गोंधळात खरेदी वगेरे वैताग देणाऱ्या प्रक्रियेत मित्स कधी कधी आमच्या बरोबर असायची.
मित्स म्हणजेच माझी बायको. तिचे नाव मिताली. परंतु ' एवढे मोठे नाव' कुठे घेत बसायचे म्हणून मला सगळे मित्स म्हणतात असं मला लग्न ठरल्याच्या काही दिवसातच सांगितले गेले होते. वर, आमच्या ग्रुप मध्ये आम्ही सर्वांना अशी नावं ठेवली आहेत असं देखील मला सांगण्यात आलं होतं. मला आठवलं की आमच्या कॉलेज मध्ये काही उत्साही मुलींनी असा प्रकार करायचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनाच सर्वांनी नावं ठेवल्यामुळे त्यांनी हा नाव ठेवण्याचा प्रयत्न बाजूला ठेवला! परंतु आता मला हेच नाव वापरावे लागणार होते. असो.
लग्नाची खरेदी होत असताना नुसता मी आणि माझा परिवारच नाही तर अख्खं जग त्यात सामील होतंय असं मला काही दिवसात जाणवू लागलं. रिसेप्शनसाठी शर्ट घेताना अचानक माझा मोबाईल वाजला. मोबाईल बघितला तर शर्ट हातात घेऊन त्याच्याकडे बघतानाचा माझा फोटो मला फेसबुक वर दिसला. माझ्या होणाऱ्या बायकोने मला तेवढ्यात tag केले होते. आणि तो फोटो अपलोड करून २ मिनिटं ही झाली नाही तर त्यावर चार उत्साही मुला-मुलींचे कमेंट आले होते. 'हे माझे ग्रुप-मेट्स. नेहमी ऑनलाईन असतात' हे वाक्य माझ्या कानावर पडले. आणि पुढील दोन ते तीन दिवस माझ्या नकळत माझे बरेच फोटो फेसबुक वर येऊ लागले. आणि त्यामुळे माझे ऑफिसातले सहकारी आणि माझे इतर मित्रही प्रत्येक खरेदी बद्दल विचारायला लागले. शेवटी सुरुवातीला विनंती आणि नंतर विनवण्या करून मी तिला हा सारा प्रकार थांबवायला सांगितला. आणि लग्ना नंतर पुढे आयुष्यभर जे करायला लागणार होतं ( आणि आता करायला लागतंय) ह्याचा माझा सराव सुरु झाला. तिने देखील, नाखुशीने का होईना, पण हे सगळं थांबवलं. परंतु फेसबुकचा उल्लेख अधून मधून होयचा. म्हणजे एखादा शर्ट घेताना ' हा फेबुकवर छान दिसेल' अशी प्रतिक्रिया यायची. क्वचित कधीतरी फेसबुक स्टेटस मध्ये मी tagged असायचो. पण जेव्हा 'thinking about someone special' ह्या स्टेटस मध्ये मला tag केले गेले तेव्हा मात्र मी हे देखील थांबवायला सांगितले आणि माझ्या नीरस असल्याबद्दल पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले!
आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. इतके दिवस मित्राचे किंवा मैत्रिणीचे लग्न होताना त्याला/तिला ज्या गोष्टीसाठी हसायचो ती गोष्ट आज मला करायला लागणार होती. स्टेजवर वेळेचे ओझे डोक्यावर घेऊन येणाऱ्या सर्वांकडे बघून हसायचे होते आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायचे होते. ह्यावर भर घालायला माझे काही मित्र ' आम्ही जेऊन घेतो' हे मुद्दाम सांगत होते.हे सगळं सुरु असताना साधारण ८ ते १० मुलामुलींचं टोळकं स्टेज चढून वर आलं. औपचारिक ओळख झाल्यावर असं कळलं की हा हिचा कॉलेजचा ग्रुप आहे. त्यांची ओळख आणि त्यांनी आमचे अभिनंदन केल्यावर फोटो काढायची वेळ आली आणि मला जवळ जवळ पन्नासाव्या वेळेस हसायची संधी मिळाली. त्यात अजून एकदा हसायची भर पडली जेव्हा त्यातील एकाने आपला मोबाईल बाहेर काढला आणि त्यावर आमचा सर्वांचा एक फोटो घेतला. आणि तेवढ्यात त्यातील एकाने सर्वांना थांबायची खूण केली. स्टेजच्या डाव्या बाजूला जो ग्रुप पुढे यायला व्याकूळ होता तो अधिक व्याकूळ झाला. क्षणभर कुणाला काही कळेना. ज्याने थांबायची खूण केली त्याने हातात काठी सारखं काहीतरी घेतलं. आणि दुसऱ्या क्षणी तिला ताणून लांब केले. आणि अगदी टोकावर स्वतःचा मोबाईल अडकवला. आणि गुढी उभारण्याच्या पोझ मध्ये ते सारे एका हातात धरले. त्या सबंध घोळक्यात मीच एकटा संभ्रमित दिसत होतो. आणि कानाला कांठळ्या बसाव्यात अशा आवाजात त्यातील तीन जणं ओरडले -- " सेल्फ़ीssssssss"
मला सेल्फी काय आहे ते माहिती होतं. परंतु त्यासाठी देखील यंत्र उपलब्ध आहेत ह्याची माहिती मला नव्हती.

लग्नात मला जी काही लोकं भेटायला आली त्यांच्यापैकी सेल्फीचा आग्रह मात्र ह्याच ग्रुप ने धरला होता. इतर बरीच लोकं येत होती. काही परिचित, काही अपरिचित आणि बरीचशी त्या वेळेपूर्ती परिचित! आता हेच बघा ना. मित्सच्या पुण्यातील एका काकांचे ज्येष्ठ मित्र आम्हाला भेटायला स्टेज वर आले. साधारण सत्तरी जवळ आलेल्या ह्या व्यक्तीची ओळख 'मंगळूरला असतात आणि बऱ्याच वर्षांनी पुण्यात आले आहेत' अशी झाली. आता हे काका पुण्यातच बऱ्याच वर्षांनी आले होते तर ते पुढे मुंबईला कधी येतील आणि आलेच तर आमच्या घरी कधी येतील हा प्रश्नच होता म्हणा! पण हाच तो तात्पुरता परिचय आणि लग्नात नेमकी ह्या अशाच लोकांची संख्या सर्वाधिक असते! माझ्यात मात्र स्टेज वर उभं राहून राहून दूरदृष्टी निर्माण झाली होती. म्हणजे आतापर्यंत मला आपण काही तासांनी जेवणार आहोत असे दिसू लागले होते. मात्र आता मी उद्या विमानात बसलो आहे, केरळला जाणारे विमान, त्या विमानात एयर-हॉस्टेस कशा असतील .… आणि एकदम " हे आपटे साहेब", असं म्हणत सासरेबुवांनी कुणाला तरी समोर उभे केले!
तर अशाप्रकारे लग्नाचा शेवट प्रचंड दगदग आणि कंटाळवाणा झाला हे मान्य करावे लागेल. दुसऱ्या दिवशी लगेच लवकर उठून कोचीला जाणारे विमान पकडायचे होते.

आम्ही विमानात बसलो. नाही म्हटलं तरी महिनाभर भरपूर दगदग झाली होती. सतत काहीतरी कामं असायची. भरपूर लोकांकडे जाणं, बऱ्याचदा त्यांच्याकडे जेवणं, त्यांचा तो वाट्टेल तसा आग्रह करणं आणि एवढं सगळं करून घरी उशिरा पोहोचून सकाळी वेळेवर कामावर जाणं. बरं, ही नातेवाईक मंडळी लग्नाला तर येणार होतीच. काही तर घरापासून अगदी जवळ राहणारी होती. पण तरीही 'आमच्याकडे जेवायला या' हे होतेच. आणि ते देखील त्यांच्या स्केड्युल प्रमाणे! नवरा मुलगा असलो तरीही मला कोणतीही सवलत नाही. एका उत्साही काका-आजोबांनी शेवटच्या क्षणी, 'आज जरा मला वेळ नाही मिळत आहे, उद्या ये' सांगून अशीच माझी पंचाईत केली होती. आणि अशा वेळेस आई नेमकी त्यांची बाजू घ्यायची. ' नेहमी कुठे बोलावतात ते' हा तिचा पवित्रा! ( तसं नेहमी कुणीच बोलवत नाही म्हणा!) तेव्हा पासून लग्न होईपर्यंत धावपळीतून अजिबात आराम मिळाला नव्हता. लग्न सुरु असताना मी झोपी जातोय का काय ह्याची मला भीती होती. परंतु सारखे 'सावधान' करणे सुरु असल्यामुळे तो प्रसंग टळला!
विमानात बसल्यावर हे सारे आठवून मी एक समाधानी सुस्कारा टाकला. परंतु कोची पर्यंत एक झोप होईल ह्याचा आनंद क्षणात मावळला.
" अरे झोपतोयस काय! आपल्याला एक सेल्फी काढायला हवा!"
" आत्ता? इथे?"
"अरे मग काय! सीटबेल्ट ची अनौंसमेंट होण्याआधी …. एक सेल्फी तो बंता है …. चल चल …लवकर … पुढे फोन स्विचऑफ करायला सांगतील …. आणि मग कोची पर्यंत नेट पण बंद होईल! त्याच्या आत आपण विमानात बसलोय हा सेल्फी फेसबुक वर नको टाकायला?"
हा एक सक्तीचा प्रोटोकॉल असल्यासारखी ही मला का सांगत होती देव जाणे! आणि त्याच क्षणी मी तो 'सेल्फी' 'फेस' केला!

आमचं फ्लाईट साधारण सकाळी ११ च्या सुमारास कोचीला उतरलं. मी जवळ जवळ तासभर का होईना झोप मिळवली होती. आता हनीमूनला जाताना प्रवासात झोपेला महत्व द्यावं हे मला देखील मान्य नव्हतंच! त्यामुळे आमच्या गप्पा देखील झाल्या. लग्न होण्या आधीच्या दोन-तीन महिन्याच्या काही आठवणी काढल्या गेल्या. काही विषयांवर गप्पा झाल्या, हसणं झालं, खिदळणं झालं. आणि विमानतळावर परत एकदा ….
" सेल्फी!!!"
'कोची विमानतळावर सेल्फी' हे शीर्षक लिहून फोटो फेसबुक वर गेला होता. आणि एका गहन हिशोबाकडे माझे लक्ष गेले.
" आपण मुंबईला विमानात सेल्फी काढलेला ना … त्याला बघ … १४८ लाईक्स आले पण", ही खूप उत्साहाने सांगत होती.
" बरं, मग?"
आणि…
" अरे मग काय … लोकांना आवडला फोटो… तुला काहीच कसं वाटत नाही… आणि त्यात तुझे मित्र खूप कमी आहेत … माझ्याच मित्र-मैत्रिणींकडून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत … तुम्ही कुणीच फेसबुक वर नसता का? करता काय मग दिवसभर?"
शेवटच्या ' करता काय मग दिवसभर?' ह्या प्रश्नाला 'काम' असे उत्तर देण्याचा मोह मी टाळला. उगीच सहजीवनाच्या दुसऱ्याच दिवशी खटका नको उडायला! शिवाय आता काढलेल्या ह्या सेल्फीला किती 'लाइक्स' आले ह्याची मोजणी काही वेळेनंतर होणार होतीच. हॉटेलकडे घेऊन जाणाऱ्या कॅब मध्ये दर दोन मिनिटांनी फेसबुकवर फोटोची पाहणी होत असताना माझ्या हे लक्षात आले. त्यामुळे मी खिडकी बाहेर पाहू लागलो आणि माझी अरसिकता पुन्हा एकदा सिद्ध झाली.
हॉटेल मध्ये साधारण १ च्या सुमारास आम्ही चेक-ईन केलं आणि रूम मध्ये शिरतानाच माझा मोबाईल जवळ जवळ अर्धा मिनिट वाजत राहिला. अनलॉक करून पाहतो तर पंचवीस एक फोटोंनी माझ्या मोबाईल मध्ये शिरकाव केला होता. हिनेच पाठवले होते. पण एवढे?
" हो! एअरपोर्ट पासून हॉटेल पर्यंत काढले", तिने उत्तर दिले. अच्छा, म्हणजे माझे पाहणे सुरु होते तेव्हा हिने टिपणे सुरु केले होते. ह्या फोटोंमध्ये रस्त्यावर असलेली रहदारी, एअरपोर्टच्या बाहेर थोडीशी मोकळी जमीन, केरळ मधली एक बस, रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक गाय, रस्त्यावर मल्याळी अक्षरात लिहिलेले एक होर्डिंग इथपासून हॉटेल बाहेर ठेवलेल्या तीन कुंड्या, हॉटेलचे नाव ठळकपणे असलेला बोर्ड वगेरेचा समावेश होता. आता मल्याळी अक्षरं सोडली तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुद्धा होत्या. काही वेळाने मला लक्षात आले की ही मल्याळी अक्षरं फेसबुक मधल्या 'अपलोड' साठी होती. ' केरळ मध्ये आहोत ह्याचे प्रुफ' असे स्पष्टीकरण बायकोकडून मिळाले.

कॅमेराच्या नजरेतून पाहण्याआधी मी हॉटेल भोवती असलेले सौंदर्य माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहून घेतले. सकाळी वॉकला आलो होतो. कोणतेही चित्र कॅमेऱ्यात टिपण्याआधी ते आपल्या डोळ्यांनी टिपले गेले पाहिजे. त्याच्यासाठी काही सेकंदाचा अवधी हवा. तरंच एक सुंदर फोटो तयार येईल …. इतक्यात माझा फोन वाजला. एवढ्या सकाळी कुणाचा मेसेज म्हणून whatsapp उघडले तर बायकोचा मेसेज! एक चहा किंवा कॉफी असलेला कप आणि त्यातून वाफा येत आहेत, शेजारी एक गुच्छ ठेवलेला आहे आणि संदेश झळकतोय … गुड मॉर्निंग! हा मेसेज माझीच बायको मला का पाठवतेय हे काही मला कळेना. आणि ते सुद्धा ५०० मीटर लांब असलेल्या हॉटेलच्या खोलीतून! मोबाईल खिशात ठेवून मान वर केली तर समोरून ही चालत येत होती …. म्हणजे हिने येता येता हा मेसेज फॉरवर्ड केला होता!!
" गुड मॉर्निंग…", मी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. " छान होता ना मेसेज … आताच आला मला", समोरच्या दृश्याचा फोटो काढीत हिने माझ्या नैसर्गिक शुभेच्छांचा निकाल लावला. आणि ' मी तुला फोटोच्या नव्हे खऱ्या शुभेच्छा देतो आहे' असं मी सांगेपर्यंत ७ फोटो काढून झाले होते. मीच तो नाद सोडून दिला. त्यानंतर रोज सकाळी ६:३० ते ७:३० च्या दरम्यान माझ्या फोन मध्ये त्याच्या शेजारी ठेवलेल्या फोन मधून शुभ सकाळ वगेरे चे मेसेज येऊ लागले.

पण इथपर्यंत भागलं नाही. माझ्या फोन मध्ये आता काही नव्या मेसजेस नी देखील शिरकाव करायला सुरुवात केली होती. ह्यांची विशेषता अशी की हे संदेश काही विशिष्ट व्यक्तींच्या भोवतीच विणले जायचे. त्यात डॉ. कलाम, अब्राहम लिंकन आणि स्वामी विवेकानंद ह्यांचा सामावेश होता. मला खात्री आहे की ही माणसं आज जर जिवंत असती तर त्यांनी ह्या सर्वांवर अब्रु-नुकसानी पासून चुकीची माहिती पसरवल्याचा खटला नक्कीच भरला असता. म्हणजे I am not handsome but I can give my hand to someone who need help... Because beauty is required in heart not in face....असं कलाम कधी म्हणाले असतील असं वाटत नाही. हिच शिक्षा विवेकानंदांना देखील दिली होती. म्हणजे एक इंग्रज माणूस विवेकानंदांना विचारतो की तुमच्या देशात स्त्रिया 'shake hand' का करत नाही? तेव्हा विवेकानंद त्याला उलटा प्रश्न विचारतात की तुमच्या देशात तुम्ही राणीला 'shake hand' करता का …. आमच्या देशात प्रत्येक स्त्री राणी सारखी आहे --- गुड मॉर्निंग, असा तो संदेश पाहून मी चकित झालो. मला काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण झाली. काही मोठ्या लोकांनी ( काका वगेरे) WhatsApp वर ग्रुप काढलेला. अजून देखील आहे. पण त्यात मी नाहीये. त्यात देखील अशाच संदेशांचा भडीमार होयचा. काही लोकसंगीत प्रकार कसे त्याचा कवी माहिती नसतो पण ती वर्षानुवर्ष पुढे सरकत आपल्या पर्यंत येतात तसंच बहुदा ह्या संदेशांचे पुढे होणार आहे. मी दहावी-अकरावीत असताना ( म्हणजे बारा वर्षांपूर्वी) ई-मेल चेक करायला महिन्यातून एकदा सायबर कॅफे मध्ये जावे लागे. तेव्हा काही फार महत्वाची ई-मेल येत नसत , नुसती फॉरवर्ड असत. त्यात एक ई-मेल असे सांगायचे की भारतातील राष्ट्रगीताला UNESCO ने जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रगीत म्हणून सन्मानित केलंय. बारा वर्षांनी जेव्हा WhatsApp वर हाच मेसेज एका काकाने फॉरवर्ड केल्यावर मी सभात्याग करतात तसा ग्रुप-त्याग केला! इतकी वर्ष झाली तरी वाजपायी ह्यांच्यापासून डॉ. मनमोहन सिंग आणि आता मोदी हे कुणीच हा सन्मान स्वीकारायला गेले नाहीत ही साधी गोष्ट कुणाच्याही लक्षात न यावी? पण काका लोकांचं ठीक आहे. त्यांच्या हातात एकदम हे तंत्रज्ञान आले. पण शाळेपासून मोबाईल बरोबरच मोठ्या झालेल्या माझ्या बायकोला देखील अशा मेसेजसची चिकित्सा करावी वाटू नये ह्याचे मला आश्चर्य वाटले.

परंतु आश्चर्य वाटण्याची ही एक सुरुवात होती असं मला काही दिवसात कळलं. कोचीहून आम्ही आता मुन्नारला आलो होतो. तिथे आम्हाला जे हॉटेल मिळाले होते ते एकदम डोंगरात बसलेले असे होते. तिथली ती शांतता आठवली ना की आपण शहरात जन्माला आलोय ह्याचा प्रचंड पश्चाताप होतो! डोंगराचा तो भाग 'U' ह्या आकाराचा असल्यामुळे दोन बाजूंमध्ये प्रचंड मोकळी जागा होती. आमचं हॉटेल एका बाजूला तर दूर दुसऱ्या बाजूला पायथ्याशी एक मंदिर होते. परंतु परिसर इतका शांत की दूर मंदिरात लावले गेलेले दाक्षिणात्य संगीत अगदी स्पष्ट ऐकू येत होते. मी त्या जागेचा शांत उभं राहून, डोळे मिटून अनुभव घेताना हिने नेहमीप्रमाणे फोटो मोहीम सुरु केलीच! त्या दिवशी रात्री जेवायला बसलो होतो.
" काय शांत परिसर आहे … मुंबईला जावेच वाटत नाही ", मी म्हणालो. ही मोबाईल मध्ये काहीतरी टाईप करत होती. त्यामुळे माझ्याकडे न बघता 'हं' एवढा प्रतिसाद आला. त्यामुळे काही सेकंदांनी मी देखील माझे सूप चे बाउल न्याहाळू लागलो. आणि तेवढ्यात …
" ओह्ह्ह …. मोदी… "

टी.वी वर पंतप्रधान कुठेतरी बोलत होते त्याची बातमी दाखवत होते.
" तुला आवडतं का राजकारण?" मी विचारलं.
" ओह्ह प्लीज … नाही आवडत … खूप बोरिंग आहे पॉलीटिक्स", ती म्हणाली. " बट आय फाईंड मोदी वेरी कूल ", हे देखील पुढे जोडले तिने.
पंतप्रधान कूल कसे असू शकतात हा विचार मी मनात दाबून धरला.
" पण तुला माहितीय का …. मी वोट द्यायला गेले होते ना.… तर मला लिस्ट मध्ये मोदींचे नाव कुठेच दिसले नाही… … आय वॉस सो कंफ्युज्ड…"
पुढच्या क्षणी मला पाणी द्यायला धावलेल्या दोन वेटर्सना मी खुणेने मागे सारले होते. इतका प्रचंड ठसका लागला होता मला. पुढे मला सांगितले गेले की नेमके तिला कमळ असलेले बटण दाबा ही जाहिरात आठवली आणि कदाचित ते म्हणजे मोदी असं समजून तिने आपले मत व्यक्त केले होते. आणि तिच्या सुदैवाने ते बरोबर निघाले. मी हे सारे ऐकून घेतले. मग तिला समजवायला सुरुवात केली की कमळ ही भाजपची निशाणी आहे. आणि तू मत मोदींना नाही तर भाजपला दिले आहेस. त्यानंतर खासदार कोण, आमदार कोण आणि मोदी निवडणुकीला कुठून उभे होते वगेरे सर्व मी तिला समजावले. मोबाईल कडे पाहणे आणि माझ्याकडे पाहणे ह्याचा समन्वय साधत मान खाली-वर करीत ती सारे ऐकत होती. मागच्या निवडणुकीच्या वेळेस ती १७ वर्षांची असल्यामुळे तिची मत द्यायची संधी हुकली होती. राज्याच्या आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत तिला रस नव्हता. त्याचे कारण तिच्या शब्दात सांगायचे तर 'तेव्हा फेसबुक, ट्विटर नसल्यामुळे मला काहीही माहिती नव्हते'.
" मी गाडी चालवते तर रस्त्यावर खड्डे असतात…. आमच्या घरी पुण्यात २४ तास पाणी येत नाही… गाडी चालवते तर सारखा ट्राफिक असतो … सो मी ठरवले की आता चेंज हवा ", तिने शेवट केला.
" पण ह्यातली कोणती कामं केंद्र सरकार करतं?" मागवलेल्या आईस-क्रीमचा फोटो काढून WhatsApp वरून पाठवणे हे माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर होते. त्यामुळे विषय तिथेच संपला. तो अजून सुरु राहिला असता तर कदाचित मी तिला सोशल मिडियाच्या पलीकडे जाउन रोजचा पेपर वाच वगेरे सांगणार होतो. परंतु ज्या प्रकारे सोशल मिडियावर चाललेल्या चर्चा अचानक संपतात (किंवा संपवल्या जातात) तसा आमचा हा विषय संपला.

आम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं! काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे. आमच्या घरी टी.वी सर्वप्रथम आला तेव्हा ऐकलेली … किंवा आपण म्हणू पाहिलेली ही गाणी आहेत.

" आमच्याकडे टी.वी आला तेव्हा सुपरहिट मुकाबला वर हे गाणं सर्वप्रथम पाहिलं ", मी एका गाण्याबद्दल हिला सांगत होतो. हिला त्याचे फार काही वाटले नाही. जी गोष्ट गाण्यांची ती गोष्ट इतर बऱ्याच गोष्टींची! तिला 'मिले सूर मेरा तुम्हारा' किंवा 'बजे सरगम' असे जुने विडीयो लावले की कंटाळा येतो . मला कधी कधी जुन्या दूरदर्शनच्या जाहिराती बघायला आवडतात. त्याने मी मधूनच सायकल आणि स्कूटर रस्त्यावर फिरत असलेल्या माझ्या लहानपणात जातो. धारा, लिरिल, बोर्नविटा, डेअरी मिल्क, रस्ना, फेविकॉल, निरमा, अमूल हे आयुष्याचा भाग नव्हते झाले अशा माझ्या बालपणी डोकावतो. हिला त्याचे विशेष काही वाटत नाही. मी आणि माझी बहिण आमचा landline फोन वाजला की तो कोण पहिले उचलतोय ह्यासाठी शर्यत लावायचो हे तिला सांगितल्यावर आपला नवरा नक्कीच लहानपणी वेडा होता अशा नजरेने ती पाहते. Landline फोन नंतरचा कॉर्डलेस फोन किंवा पेजर वगेरे चा प्रवास तिने अनुभवलेला नसावा. कारण त्याबद्दल घरी कधी विषय निघाला तर ती त्यात सहभागी होत नाही. घरी कधी दूरदर्शनच्या सिरियलच्या आठवणी निघाल्या की ही काही मिनिटांमध्ये आतल्या खोलीत निघून जाते. हिच्या आठवणी ह्या ह्रितिक रोशन पासून सुरु होतात आणि बऱ्याचशा नंतरच्या हिरो-हिरोइन्स पर्यंत येउन पोहोचतात. हिला श्रीमान-श्रीमती मध्ये रस नाही पण फ्रेंड्स मध्ये आहे. ज्या गोष्टी मला कॉलेज संपताना मिळाल्या त्या तिच्याकडे दहावीतच आल्याचे माझ्या लक्षात येत होते. ह्या साऱ्या यादीत इंटरनेट, फेसबुक आणि मोबाईल फोन ह्याचा देखील समावेश होता. तिने सायबर कॅफेचा उपयोग केवळ प्रिंट काढायला केला होत. तिला कळायला लागणाऱ्या वेळेत तिच्याकडे कॉम्पुटर आणि इंटरनेट हे दोन्हीही आले होते. त्यामुळे जुन्या टी.वी विडीयो गेम्स बद्दल बोललं तर तिला काही कळायचं नाही. पण तिला कॉम्पुटर गेम्स बद्दल सगळी माहिती होती. एकूणच असं की हे सगळं तिच्याकडे एकदम आलं होतंं. माझ्यासारखी ती कोणत्याही प्रक्रियेला सामोरी गेली नव्हती.

तिला खेळाची देखील आवड होती. पण तिचे फेडरर-प्रेम हे साम्प्रासला न बघता निर्माण झाले होते आणि सचिन तेंडुलकरची शेवटची दहा वर्ष तिने पाहिल्यामुळे तो निवृत्त झाला तरी तिचे आयुष्य सुरळीत सुरु होते.

पण एवढं असून सुद्धा ही दरी मी भरून काढायचा प्रयत्न करू शकत होतो. परंतु ती दहावीतच असताना फेसबुक तिच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्याच्या जवळ जवळ चार एक वर्ष तरी आधी इंटरनेट! त्यामुळे ही दरी भरून काढणं मला नक्कीच जड जात होतं. आणि ते वापरण्यात मी नक्कीच कमी पडत होतो. म्हणजे फेसबुक आणि एकूण सोशल मिडिया हे तुमच्या आवडी जोपासणाऱ्या, सम-विचारी लोकांना शोधणारे आणि त्या नंतर त्यांना प्रत्यक्ष भेटून मैत्री करायसाठी उत्तम माध्यम आहे एवढेच मला माहिती होते! परंतु त्याच्या पलीकडे देखील त्याचे भरपूर उपयोग आहेत हे मला काही दिवसात समजले. निमित्त होते एका रविवारी - लग्नाला दोन महिने झाले म्हणून (!) - दिवसभर फिरायला जाण्याचे. तिला एव्हाना नोकरी देखील लागली होती. परंतु ती जिथे जायची तिथे मेट्रो ने जावे लागत नव्हते. आणि ही पुण्याची असल्यामुळे तिला मेट्रो मध्ये बसायचे आकर्षण होते. पण आमचा अख्खा दिवस साऱ्या जगाने पाहवा अशी तिची योजना होती! त्यामुळे मेट्रो मध्ये बसायच्या आधी घाटकोपर स्टेशनवर 'excited to ride mumbai metro for first time' असा स्टेटस फेसबुक वर लिहिला गेला आणि 'with' मध्ये माझे नाव! त्या नंतर दोन मिनिटे नाही झाली की 'and the ride begins' म्हणून पुन्हा फेसबुक स्टेटस…. सोबत मी होतोच! पाच मिनिटांनी मी तिला खाली दिसणारी रहदारी दाखवणार तेवढ्यात एका सेल्फीची फर्माईश! मग पुढे 'mumbai metro selfie' अशा नावाने पुन्हा आम्ही फेसबुकवर! एव्हाना अंधेरी स्टेशन आले आणि उतरायची वेळ झाली. मुंबई मेट्रोच्या ब्रिज वरून दिसणारी मुंबई बघायचीच राहिली.… पण हे सगळं संपलं नव्हतं! त्यानंतर जेवताना प्रत्येक डिशचा काढलेला फोटो आणि प्रत्येक वेळेस त्याचा फेसबुकवर मांडलेला पंचनामा हे काही संपत नव्हतं. दिवसाचा शेवटचा टप्पा हा पिक्चर बघण्याचा होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पिक्चर बघताना देखील साधारण दर १५ ते २० मिनिटांनी मोबाईल बाहेर काढला जात होता. थेटरात बसलेले बहुतांश तिच्या वयाचे लोक मला हेच करताना आढळत होते. आणि मला अपेक्षित होते तेच झाले. घरी परत येताना पिक्चर बद्दल काही बोलताच आले नाही. कारण बहुतांश गोष्टी तिच्या नीट लक्षातच नव्हत्या!

बाकी इंटरनेट आणि मोबाईल हे आता अविभाज्य घटक वगेरे राहिले नव्हते. तर ते एक शारिरिक विस्तार झाले होते! त्यामुळे काही मजेशीर गोष्टी देखील होयच्या. माझा एक चुलत भाऊ अमेरिकेत असतो. तिथे कुठे फिरायला गेला तर तिथले फोटो आमच्याशी शेअर करतो. त्यातलाच एक फोटो पाहताना हिने प्रतिक्रिया दिली होती
" अरे… ही झाडं बघ ना … Farmville सारखी आहेत!"
तशीच एक प्रतिक्रिया तिने चर्चगेटच्या रस्त्यांवरून जाताना एका sweet-shop कडे पाहून दिली होती. तिथल्या डब्यांमध्ये विविध प्रकारच्या गोळ्या ठेवलेल्या पाहून तिची प्रतिक्रिया होती की त्या candy crush saga ह्या खेळासारख्या होत्या. दोन्ही वेळेस मला हेच सांगावे लागले की ह्या दोन खेळांची संकल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या गोष्टींपासून निर्माण झाली आहे. असाच एक प्रसंग फेसबुक नवीन आले तेव्हा मी अनुभवला होता. तेव्हा मी कॉलेजला होतो. फेसबुकची संकल्पना मूळ अमेरिकन. तिथल्या जीवनपद्धती मुळे निर्माण झालेल्या सर्व गोष्टी ह्या माध्यमातून आपल्याला दिसतात. त्यात एक 'poke' असा पर्याय आहे. ह्याचा अर्थ बोटाने हलकेच टोचणे. म्हणजे तिथे कामानिमित्त एकमेकांपासून लांब गेलेली माणसं फेसबुक वर प्रतिसाद द्यायची थांबली तर आपण त्यांच्या प्रोफाईल वर जाउन हे poke चे बटण क्लिक करायचे. पण हीच गोष्ट आमच्या बिल्डींग मधल्या दहावीतल्या दोन पोरांनी ( एक पहिल्या आणि दुसरा दुसऱ्या मजल्यावर राहणारा) सुरु केली तेव्हा मला हसावं का रडावं हेच कळेना! शिवाय ते एकमेकांना बाहेर सागायचे देखील,
" अरे … मी तुला poke केलंय हं … घरी गेल्यावर मला परत कर"

आता जाणवतं की ही देखील त्या वेळेस नववी-दहावीतच तर होती! मग वाटलं की फेसबुकची मूळ संकल्पना ह्या मुलांना समजली आहे का? फेसबुक किंवा एकंदर सगळ्याच प्रकारचा सोशल मिडिया हा संपर्क तुटलेल्या मित्र-मैत्रिणींशी पुन्हा संपर्कात येण्याचं साधन आहे हे त्याचे भारतातले विश्लेषण झाले. पण ह्याचा मूळ हेतू 'नेटवर्किंग' हा आहे. आपल्यात ज्या विशेष आवडी-निवडी आहेत आणि ज्या कालांतराने आपल्या स्वभावात प्रवेश करतात त्या आवडी-निवडी आपल्या पारंपारिक मित्र-वर्तुळात असतीलच असं नाही. सोशल मिडिया मात्र तसे वर्तुळ जमवतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक खुलवतो. फेसबुक हे आपण नेहमीच भेटतो त्या मित्र-मैत्रिणींबरोबर फोटो काढायची जागा नाही. फेसबुक काय WhatsApp आणि गेला बाजार 'एसएमएस' ह्या माध्यमांची सुद्धा आपण अशीच भेसळ केली! ह्या दोन्हींचा वापर रोजचे महत्वाचे संदेश पाठवणे हा आहे. त्यात आपण मोठ्ठाले निबंध पाठवून त्याचा वेगळाच उपयोग केला. मी वय वर्ष ४० आणि पुढे असलेल्या लोकांबद्दल एकवेळ समजू शकतो. कारण हे सारं त्यांच्या आयुष्यात एकदम आलं. काहींच्या तर उतारवयात! परंतु तंत्रज्ञाना बरोबर वाढणाऱ्या वयोगटाकडून असे निश्चित अपेक्षित नाही. त्यामुळे ही ऑफिस मध्ये गेल्यावर तिच्या तिथल्या मैत्रिणी बरोबर कॉफी पिताना फोटो काढून फेसबुकवर का टाकते माहिती नाही! रक्षाबंधन किंवा भाऊबीज साजरी झाल्यावर स्वतःच्या भावाला फेसबुक वर tag करायची विशेष गरज आहे का? ' मला हा दागिना खूप आवडला … त्यामुळे तू मला तो घेऊन दे' अशा एका वाक्यात हिने मला tag केलेलं! गम्मत म्हणजे तसा विषय त्या दिवसानंतर एकदाही आमच्या घरी चर्चेत आलेला नाही. मग एकदा लग्न होऊन दोन महिने झाले म्हणून एका स्टेटस मध्ये मी होतो. तोच मी बाहेर जेवायला गेलो की पण असायचो. म्हणजे तिच्या बरोबर तर असायचो पण ती फेसबुक वर एकटी पडू नये न …म्हणून तिकडे पण बरोबर असायचो! हल्ली मॉल मध्ये गेलो की मध्येच एके ठिकाणी सेल्फी साठी उभं रहावं लागतं. कधी मध्येच 'माझा फोटो काढ ना' ची फर्माइश होते आणि मग एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला ती आणि मधून जाणारी माणसं असं चित्र होतं! काही लोकं सौजन्य दाखवतात आणि फोटो होऊ देतात आणि आपल्याला आणखी खजील करतात. आणि मी विचार करू लागतो की ह्या फोटोंचे पुढे होते काय? म्हणजे एकदा असंच मॉल मध्ये काढलेल्या फोटोबद्दल मी हिला विचारलं. तर तेव्हा समजलं की तो फोटो जुन्या फोन मध्ये होता आणि आता तो फोन एकदम खराब झाल्यामुळे सापडणं कठीण आहे. मग हे फोटो काढले कशाला होते? त्याचा काही विशिष्ट अल्बम बनवला गेला का? फोटो ही एक आठवण की एक क्षणिक सोय? ह्या आणि अशा बऱ्याच प्रश्नांना मी सामोरे जात असतो. उत्तर सापडणं अवघड आहे.

परंतु एका घटनेने माझे थोडेसे मत-परिवर्तन झाले. एका पारिवारिक कार्यक्रमाला आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. माझ्या लहान बहिण-भावंडांचं हिच्याशी फार छान जमतं. सर्व बऱ्यापैकी सारख्या वयाचे असल्यामुळे असेल. त्या दिवशी प्राथमिक गप्पा झाल्यावर ठरलेलं फोटो सेशन सुरु झालं. ह्यांचे बरेच फोटो काढून झाल्यावर आम्हा मोठ्या बहिण-भावांना त्यात ओढले गेले. आम्ही अगदी पहिले नाही वगेरे म्हटले तरीही शेवटी त्यात सामील झालो. मोबाईलच्या चांगल्या दर्जामुळे फोटो देखील छान येत होते. आणि तेव्हा मनात विचार आला की आपले असे फोटो किती आहेत? काही लहानपणीचे वाढदिवसाचे वगेरे, थोडेफार शाळेतले ( शाळेनेच काढून दिलेले) काही कॉलेज मधले आणि थोडेफार नवीन फोन ने काढलेले. आपण अशा बऱ्याच कार्यक्रमांना मित्र-मैत्रिणींबरोबर, बहिण-भावांबरोबर उपस्थित राहिलो आहे? पण ते क्षण आपण टिपू शकलो नाही. आपल्याकडे जुना कॅमेरा होता, रोल फिरवायला लागायचा आणि त्यावेळेस ह्या सर्व कारणांमुळे फोटोची सवय नव्हती. अगदी फार जुनी गोष्ट नाही ही. पण आता तंत्रज्ञान आहे तर असा उपयोग का करू नये? तीच गोष्ट आपल्या लहानपणीच्या फोटोंची! काही मोजके फोटो सोडले तर आपल्याकडे आपलं लहानपण उलगडणारे फोटो नाहीत. पण आज आई-वडील आपल्या मुलांची वाढ फोटोच नव्हे तर विडीयो वर देखील टिपू शकतात. आणि हे साठवलेले क्षण अगदी पंधरा वर्षानंतर पुन्हा अनुभवू शकतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींना नावं ठेवणे किंवा त्यांच्या संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात काही अर्थ नाही.

हेच विचार डोक्यात ठेवून मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो. वर सांगितल्याप्रमाणे मी ई-कॉमर्स क्षेत्रात कामाला आहे. ह्या क्षेत्राची प्राथमिक ओळख म्हणजे आपण जे व्यवहार दैनंदिन आयुष्यात करतो तेच व्यवहार इंटरनेट वरून करणाऱ्या कंपन्यांचे क्षेत्र. तसं मी हॉटेल बुकिंग इंटरनेट वरून करून देणाऱ्या कंपनीत कामाला आहे. त्याच दिवशी आमच्या कंपनीत दोन मोठ्या पदांवर नियुक्ती झाली. ही दोघं म्हणजे नुकतीच कॉलेज मधून बाहेर पडलेली २३ वर्षांची मुलं! गुगल ह्या वेबसाईट वर कंपनी अगदी पहिल्या पानावर झळकावी ( आणि लोकांच्या नजरेस पडावी) ह्याची एक सोपी पद्धत त्यांनी interview मध्ये सुचवलेली होती. कंपनी मध्ये कुणालाही आजपर्यंत ह्याचा अंदाज आला नव्हता. त्यामुळे आता माझ्या बरोबरीच्या पदावर माझ्याहून ५ वर्षांनी लहान असलेली दोन मुलं दाखल झाली होती. आणि ह्याचा आम्हाला फायदाच होत गेला. ह्या मुलांकडे नवीन कल्पना भरपूर होत्या. इंटरनेट क्षेत्रात वावर आमच्यापेक्षा अधिक होता. फक्त सकाळच्या मिटिंगला मोबाईल बाजूला ठेवणं त्यांना जमत नव्हतं. कुणी दोन -तीन मिनिटं बोलायचं थांबलं की लगेच मोबाईलवर फेसबुक वगेरे बघितलं जायचं. मिटिंग मध्ये स्वस्थ बसणं जरा अवघड जायचं. इंटरनेट सर्व्हिस थोडीशी मंदावली की लगेच नापसंती व्यक्त केली जायची. पण आमच्या क्षेत्रात एकूण ह्या वयाच्या मुलांनी कंपनी सुरु केल्याची देखील उदाहरणं येत होती. भारतातले बरेच नवीन CEO हे पंचवीस वर्षांच्या जवळचे होते हे मध्ये एका अहवालात प्रसिद्ध झाले होते. म्हणजे ह्यांची कल्पनाशक्ती विसाव्या वर्षी जागृत होत गेली होती. अशी ही उदाहरणं आम्हाला देखील एक सकारात्मक आव्हान देत होती.

अशाच मन:स्थितीत मी घरी आलो. बायको किचन मध्ये चहा करत होती. तिच्या हातातून चहा चा कप घेतला आणि खिशातून मोबाईल बाहेर काढून म्हणालो,
"सेल्फी!"

जुळवून घ्यायला सुरुवात झाली होती.

- आशय गुणे :) 

2 comments: